Varnecha Wagh -Anna Bhau Sathe
पुणे-कोल्हापूर मार्गावर लोक जमत होते आणि फकिराला पाहात होते. लोकांच्या झुंडीच्या झुंडी सडकेकडे धावत होत्या. सडकेच्या दुतर्फा लोक उभे राहून फकिराला पाहात होते आणि हळहळत परत जात होते. कैद्यांच्या पायांतील साखळदंडांचा खळखळाट ऐकून लोकांना चीड येत होती.
फकिरा एकाच गोष्टीचा विचार करीत होता. सत्तू जर आला असता, तर आज जे घडलं, त्यापेक्षा वेगळं काहीतरी घडलं असतं.
जेवणवेळ केव्हाच टळून गेली होती. रात्र वाढत होती. नदीकाठी घनदाट शेवऱ्यात सत्तूचा तळ पडलेला होता. सत्तू अस्वस्थ झाला होता. तो उताणा पडून फकिराबद्दल विचार करीत होता. त्या विचारांनी त्यांच्या अंगाला चटके बसत होते. सर्व लोक जेवून एकत्र येऊन बसले, तेव्हा सत्तू उठून बसला आणि त्यांना म्हणाला,
“सरकार फकिराला कैद करून घेऊन जात आहे. मला मदतीला बोलवा, मी ही वारणामाई घेऊन येईन, असं मी त्याला ह्या वारणामाईला साक्ष ठेवून वचन दिलेलं होतं, पण ते वचन मला पाळता आलं नाही. मी दुबळा ठरलो. सरकारी लोकांनी मला रेटलं नि मी रेटला गेलो. मी काहीच करू शकलो नाही. फकिराचं काय, तो उद्या नाही तर परवा तोफेच्या तोंडी जाईल. तो माझ्यावर हत्यारानं उपकार करणारा आपलं कर्तव्य करून गेला आहे; पण मला माझं कर्तव्य पार पाडता आलं नाही. आकाराम, गुणवंतराव, तुम्ही या गोंदाला विचारा, मदतीला ये म्हणताच तो रणमाजी हत्यारांची कृष्णाच घेऊन या वारणाकाठी आला आणि बहादुरवाडीच्या मळीला त्यानं चालवलेली तलवार तुम्ही पाहिलीतच.”
“मग दादा, तुमचं म्हणणं काय आहे?” आकारामानं विचारलं. सत्तू गंभीर स्वरात उत्तरला,
“अजूनही वेळ गेलेली नाही. अजूनही वाटेत कुठंतरी सरकारी काफिल्यावर हल्ला करून, फकिराच्या सुटकेचा शेवटचा प्रयत्न करावा, असं मला वाटतं-”
सत्तू बोलत होता. त्याचा प्रत्येक शब्द शेजारच्या वारणानदीच्या पात्रात घुमत होता. जणू काय, वारणाच ते बोलत होती.
– वारणेचा वाघ, पृ. ५७-५८
Reviews
There are no reviews yet.